रविवार, २ मार्च, २००८

तेंडुलकरची कमाल

ऑस्ट्रेलियात सध्या चालू असलेल्या सीबी सिरीजच्या अंतिम फेरीतिल पहिल्या सामन्यात तेंडुलकरच्या उत्तम बॅटिंगमुळे भारताने आता १-० अशी आघाडी मारून ह्या तीन सामन्यांच्या अंतिम फेरीत आपली बाजू बळकट केली आहे. सचिनकडून भारतीयांच्या आणि एकंदरच क्रिकेटप्रेमींच्या फार अपेक्षा असतात. कधी कधी सलग ३-४ सामन्यांत त्याला फारश्या रन नाही काढता आल्या तर लगेच लोकांची टीका सुरू होते. मग सचिन केवळ प्रथम बॅटींग करतानाच चांगला खेळतो, पण दुसऱ्या इनिगमध्ये जर दबावाखाली लक्ष गाठायची वेळ आली तर त्याची बॅटींग तितकीशी चांगली होत नाही अशी टीका होते. आकडेवारीकडे पाहिले तर असे दिसून येईल की सचिनची धावांची सरासरी दुसऱ्या इनिंगमध्ये कमी आहे. पण सचिनने एकहाती भारताला जिंकून दिलेल्या कितीतरी सामन्यांची उदाहरणे देता येतील. सचिनच्या धावांचा डोंगर भारतीय संघाच्या काही उपयोगी पडत नाही अशी टीका निरर्थक आहे हे त्यावरून सिद्ध होईल. कालच्या सामन्यात रन काढण्याबरोबरच सचिनने आणखी काही करून दाखविले असेल तर ते हे की त्याच्या अनुभवाचा उपयोग तो नव्या खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठीही करतो. रोहित शर्माच्या बॅटींगवर सचिनचाही परिणाम झालाच असणार. मी ह्यात रोहितचे श्रेय हिरवून घेण्याचा मुळीच प्रयत्न करीत नाहीये. त्याने शांत डोक्याने बॅटींग करून ६६ रन उभ्या केल्या हे निश्चितच कौतुकास्पद आहे. त्याच्या ह्या कामगिरीमुळे सचिनवरील भारही निश्चित हलका झाला हे सचिनच्याच तोंडून मॅन-ऑफ-द-मॅच पुरस्कार स्विकारताना आपण ऐकलं असेलच. गिल्ख्रिस्ट प्रमाणेच कदाचित सचिनचाही सिडने क्रिकेट ग्राउंडवरील हा शेवटचा सामना ठरेल. ऑस्ट्रेलियात खेळलेल्या आधीच्या ३९ एकदिवसीय सामन्यांत एकही शतक त्याला काढता आले नव्हते. मगच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तर तो काहि वेळा नव्वदीत बाद झाला. ती सगळी कोळीष्टके काल त्याने साफ करून टाकली. शिवाय मागील काही महिन्यात झालेल्या टेस्ट मॅचेसमध्ये उत्तम फलंदाजी केल्यानंतर एकदिवसीय सामन्यात मात्र त्याची कामगिरी म्हणावी तशी चांगली झाली नाही. एक श्रीलंकेच्या सामन्यात काढलेल्या ६३ धावांव्यतिरिक्त सीबी सिरीजमध्ये त्याची कामगिरी यथातथाच होती. पण योग्य वेळ येताच आपली कामगिरी उंचावून त्याने आपले मोठेपण पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
Blogged with the Flock Browser

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: